पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात‘ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. 2022 मधील ‘मन की बात‘चा हा पहिला भाग होता. जिथे कर्तव्यनिष्ठा असते तेथे भ्रष्टाचाराला संधी नसते असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज बापूंच्या शिक्षणाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. पंतप्रधानांनी भारताच्या भविष्याविषयी तरुणांच्या स्वप्नांचा उल्लेख केला. यासोबतच देशाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्ती मिळावी असे आवाहन केले.
मोदी प्रारंभी म्हणाले की, नुकताच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशाच्या पराक्रमाची आणि सामर्थ्याची झलक आपण राजपथावर पाहिली, त्याने देश अभिमानाने आणि उत्साहाने भरून गेला आहे. आता प्रजासत्ताक 23 जानेवारीपासून म्हणजेच नेताजींच्या जयंतीपासून सुरू होईल आणि 30 जानेवारीपर्यंत म्हणजेच गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत चालेल. बाईट
यादरम्यान मोदींनी मुलांनी पाठवलेली पत्रे वाचून दाखवली. राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचे आवाहन केले.
इंडिया गेटजवळील अमर जवान ज्योती आणि नॅशनल वॉर मेमोरियल ज्योतीला एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले. या भावनिक प्रसंगी शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही माजी लष्करी सैनिकांनी मला लिहिले की, हुतात्म्यांच्या स्मृतीसमोर पेटलेली ज्योत शहिदांच्या अमरत्वाचे प्रतीक आहे. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा नॅशनल वॉर मेमोरियलला नक्की भेट द्या. तुमचे कुटुंब आणि मुलांना घेऊन जा. तुम्हाला वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, एक कोटीहून अधिक मुलांनी मला त्यांची मन की बात पाठवली आहे. ही पत्रे देश-विदेशातून आली आहेत. यातील बरीच पोस्टकार्ड वाचण्याचा प्रयत्न केला आहे. बाल पुरस्कार आणि पद्म पुरस्कार विजेत्यांचे कौतुक त्यांनी केले.
सध्या देशात ओमीक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. पण भारतही तितक्याच वेगाने कोरोनाशी लढतो आहे. देशात ४.५ कोटी मुलांना लस देण्यात आली आहे. संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे ही सकारात्मक बाब आहे. लशीवर आमच्या देशातील जनतेने विश्वास ठेवला ही मोठी बाब आहे. १५ ते १८ वयोगटातील किशोरांचे लसीकरण केल्याने त्यांना कोणताही अडथळा न घेता आपले शिक्षण पूर्ण करता येईल. लसीकरणामुळे त्यांच्या मनातील कोरोनाची भीती घालविली आहे असे मोदी म्हणाले.
एकंदर, देश भ्रष्टाचार मुक्त करणे, सैनिकांचा त्याग, मुलांच्या पत्रातून व्यक्त झालेल्या भावना आणि कोरोना लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून आज देशवासीयांशी मुक्त संवाद साधला.

