मंत्री आनंद सिंग यांनी केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांची भेट घेतली असून या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात काही बदल होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. बेंगळूर मधील सदाशिवनगर येथील डीकेशींच्या निवासस्थानासमोर खाजगी वाहनात हि भेट घडली आहे.
व्हॉइस : केवळ १० मिनिटे झालेल्या या बिठकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. बंद कारमध्ये झालेल्या बैठकीनंतर कुतुहलात्मक चर्चेला उधाण आले आहे. हि चर्चा नेमक्या कोणत्या विषयांवर झाली यासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसमधील १६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्य्स्फोट केला आहे. परंतु याला काँग्रेस नेत्यांनी मात्र नकार दिला आहे. पुढील निवडणुकीत देखील आपलीच सत्ता येईल असा विश्वास भाजप नेत्यांकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित या साऱ्या कारणांवर विचार विनिमय करण्यासाठी आनंद सिंग यांनी डीकेशींची भेट घेतली असावी अशी चर्चा होत आहे.
मंत्री आनंद सिंग यांना अपेक्षित खाते आणि मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मात्र याबद्दल जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. २०२३ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उभयतांमध्ये चर्चा रंगली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. उभयतांच्या या बैठकीवर आता मंत्री आनंद सिंग यांनीच स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.
या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर डीकेशींनी खुलासा व्यक्त केला असून आनंद सिंग आणि आपली भेट आज सकाळी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मेकेदाटू पदयात्रा, तुंगा आरती, पर्यटन विकास, कावेरी अर्कावती संगम परिसराचा विकास अशा अनेक संदर्भात आपली चर्चा झाली असल्याचे डीकेशींनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीसाठी केवळ १ वर्ष तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून आतापासून राजकीय मोर्चेबांधणीला राजकारण्यांसह राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपने केलेला काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराचा दावा आणि तोच दावा फेटाळून लावणारे काँग्रेस पक्षातील नेते या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये आगामी काळात कोणते राजकीय बदल पाहायला मिळतील, हे पाहावे लागेल.

