सत्तेवर असताना काय किंवा सत्तेवर नसताना काय, काँग्रेसने जनहिताची कामे कधीच केली नाहीत. केवलपल्या स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केला अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
बंगळुरात रविवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, काँग्रेसने जनहिताची कामे कधीच केली नाहीत. मग त्यांना सत्ता कशी मिळणार? सत्तेचा गैरवापर आपल्या स्वार्थासाठी कसा करता येईल याचाच विचार ते करत राहिलेत. पूर्वी कितीतरी प्रसंगात आम्ही पाहिले आहे, काँग्रेसचा कोणताही नेता असो, नेतृत्व बदलानंतर आलेला असो, त्यांच्या कार्यपद्धतीत, धोरणात बदल झालेला नाही. स्वार्थाचे राजकारण करणे हेच त्यांचे धोरण राहिले आहे. तो त्यांचा गुणधर्मच आहे अशी टीका बोम्मई यांनी केली.
म्हैसूरमधील भाजप नेत्यांमधील वाक्युद्धाबाबत बोम्मई म्हणाले, केवळ विकासावरून त्यांच्यात मतभेद आहेत. २ आमदार आणि खासदारांमध्ये विकास कशा पद्धतीने व्हावा यावरून मतभेद आहेत. त्यांना बोलावून चर्चा करेन, कोणती विकासकामे कधी करायची याबाबत मते जाणून घेईन. अन्य कशावरून त्यांच्यात मतभेद नाहीत. विकासावरून काही मतभेद असतील भिन्न अभिप्राय येणे स्वाभाविक आहे अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली.
एकंदर काँग्रेस नेत्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी बरीच आगपाखड केल्याचे यावेळी दिसून आले.

